पालघर – योगेश चांदेकर:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्यामुळे विक्रमगड, डहाणू तालुक्यातील रोजगारासाठी गेलेल्या आदिवासी समाजाच्या ३० तरुणांना कोल्हापूर येथेच अडकून राहावं लागलं होतं. सर्व प्रशासकीय यंत्रणांकडे मदतीसाठी प्रयत्न करून देखील त्यांची कोल्हापुरातून निघण्याची व्यवस्था होत नव्हती. त्यामुळे शेवटी त्या तरुणांनी हर्ष फाऊंडेशनचे रिकी रत्नाकर यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली. कोल्हापुरात अडकलेल्या त्या तरुणांची परिस्थिती लक्षात घेत रिकी रत्नाकर यांनी क्षणाचा विलंब न करता याबाबतची माहिती पालघर जिल्हापरिषद अध्यक्षा भारती कामडी यांना दिली.
जि. प. अध्यक्षा भारती यांनी प्रशासनाच्या सहकार्याने रीतसर त्यांचे पास काढून त्यांना आणण्यासाठी ७ चार चाकी गाड्या कोल्हापूरला पाठवल्या. ५ चार चाकीत प्रत्येकी ४ तरुण व उर्वरित दोन चार चाकीमध्ये प्रत्येकी ५ तरुणांना सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळत परत आणण्यात आले. आलेल्या सर्वजणांची गरजेची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यात आले. तसेच या सर्वांना आरोग्य प्रशासनाने पुढील १४ दिवस घरातच क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परत आलेल्या त्या सर्व तरुणांनी व त्यांच्या पालकांनी जि. प. अध्यक्षा भारती कामडी, रिकी रत्नाकर, त्यांचे सहकारी व प्रशासनाचे आभार मानले.