पालघर: कार्यतत्पर पोलीस अधिकाऱ्याच्या बदली विरोधात सर्वपक्षीय बोईसरकर मैदानात

0
922

पालघर – जितेंद्र पाटील:

बोईसर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध समाजाचे लोक राहतात त्यामुळे वेगवेगळ्या सण-उत्सवां दरम्यान सामाजिक सलोखा राखण्याचे मोठे काम पोलिसांना करावे लागते. त्यातच बोईसर MIDC मुळे देखील यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो. “आधीच हौस त्यात पडला पाऊस..!” या म्हणीप्रमाणे वर्षभरापासून असलेलं हे कोरोनाचं संकट. आता इतकं सगळं असून देखील कार्यक्षेत्रात एकही अनुचित प्रकार घडू न देणारे पोलीस ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात काम करतात तो अधिकारी देखील खमक्याच असावा लागणार! पोलीस अधिकारी खमक्या असला कि त्याच्या नावाची अवैध धंदे चालवणारांच्या गोटात दहशत असते. त्यातला विशिष्ट एक गट हा नेहमीच अशा अधिकाऱ्यांवर डुख धरून असतो. आपल्याला वरदहस्त देणाऱ्या लोकांच्या मदतीने ते अशा अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी संधीच्या शोधात असतात. बोईसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांची ख्याती जिल्हाभर एक कार्यतत्पर पोलीस अधिकारी अशीच आहे. मात्र पोलीस उपनिरीक्षक धूमाळ हा लाच लुचापत विभागाच्या जाळ्यात अडकला अन त्याचे खापर कसबे यांच्यावर फोडत त्यांची तडकफडकी बदली करण्यात आली. वर्दीतला सहृदयी पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्या बदलीविरोधात सर्वसामान्य व सर्वपक्षीय बोईसरकरांनी दंड थोपटले आहेत.

‘आपल्या साहेबांची बदली रद्द झालीच पाहिजे’ असा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे. सोशल मीडियाद्वारे फेसबुक, व्हाट्सअप ग्रुपवर या आणि यासह बदलीबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या ढीगभर पोस्ट बोईसर सह जिल्हाभर फिरत आहेत. विविध पक्षाच्या नेत्यांनी कसबे यांची बदली अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करत हि बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. कर्तव्य निष्ठ आधिकाऱ्याला एका पोलिस कर्मचाऱ्याच्या चुकांसाठी दोषी धरणे योग्य नसून त्यांनी एक अधिकारी म्हणून केलेल्या कामाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कोरोना काळात मोठा कामगार वर्ग असणाऱ्या बोईसरमध्ये कायदा सुव्यवस्था राखणे हे मोठं जबाबदारीचं आणि तितकंच जिकरीचे काम होते. कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन वेळी घरात बसण्यासाठी परप्रांतीय कामगारांसोबतच स्थानिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम देखील आपल्या सहकाऱ्यांसह मोठ्या शिताफीने केले. आशिया खंडातील सर्वात मोठी बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतमधील कारखाने बंद झाल्याने सुमारे राज्यातील व परराज्यातील हजारो कामगारांचे उपजीविकेचे साधन बंद झाल्याने त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आल्याने हजारो कामगार स्थलांतराच्या मार्गावर होते. स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनासमोर याचे मोठे आव्हान होते. अशावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्यातील सहृदय माणूस हा हजारो लोकांसाठी अन्नदाता बनून मदतीला आला.

इतकंच नाही तर कसबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन वर्षांत बोईसर औद्योगिक शहरातील काम करणाऱ्या कामगारांचा मोर्चा अथवा एक ही आंदोलन बोईसर पोलीस स्टेशनमध्ये झाले नाही याचे मुख्य कारण म्हणजे कंपनी प्रशासन व कंपनी कामगार यांच्यामध्ये योग्य समन्वय निर्माण करून कामगारांना योग्य न्याय मिळून दिलेला आसल्याने कामगार वर्ग ही प्रदीप कसबे यांच्या बदल आदर व्यक्त करत आहेत. बोईसर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध समाजाचे लोक राहतात परंतु आजपर्यंत कधीही या दोन वर्षांमध्ये बोईसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कधीही जातीय वादाच्या घटना घडल्या नाहीत. हि त्यांच्यासह सामाजिक समतोल राखण्यासाठी धडपडणाऱ्या सर्वच लोकांच्या प्रयत्नाला मिळालेलं फळचं म्हणावे लागेल. कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीतून वेळ खर्च करणारा अधिकारी, सर्वसामान्यांच्या मनात पोलीस मित्र असल्याची भावना वाढीस लागावी यासाठी काम करणारा अधिकारी, स्वच्छ आणि स्पष्ट काम करणारा अधिकारी अशी ना-ना वेगवेगळ्या बिरुदावल्या जनतेने खुशीने दिल्या त्या कसबे यांच्या प्रामाणिक कामामुळेच.

अशा जनतेच्या मनात घर केलेल्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली बोईसरमधील लोकांना रचलेली नाही. त्यामुळे कसबे यांची बदली तात्काळ रद्द करून त्यांच्याकडे पुन्हा एकदा बोईसरचाच चार्ज द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. सरकार, प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी असते. व्यवस्थेबाबत समाजाच्या मनात आत्मीयता, आपुलकी निर्माण व्हावी यासाठी काम करणे हेच प्रशासन व सरकारचे प्रमुख कार्य म्हणता येईल. त्यामुळे सुव्यवस्थेची बसलेली घडी उलगडू नये यासाठी हि बदली रद्द करावी अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. कसबे यांना बदलीबाबत विचारणा होत असताना आपला दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्याचे ते सांगत आहेत पण सर्व सामान्य नागरिकांपासून सत्य लपत नाही. विनाकारण झालेल्या बदलीचे दुःख लपविण्याचे कसब आणि धैर्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक कसबे यांच्याकडे असेल, मात्र बोईसरकारांना दैवाने मिळालेला इतका सक्षम अधिकारी तूर्तास तरी गमवायचा नाही आणि यासाठी ते वाट्टेल तो लढा उभारण्याच्या मानसिकतेत आहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. हे दिसून देखील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत असा विश्वास देखील लोकांच्या बोलण्यातून जाणवत आहे.

“कसबे साहेबांनी बोईसर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्या नंतर एवढ्या मोठ्या उद्योग नगरीत कायदा सुव्यवस्था आबादित ठेऊन बोईसर मध्ये सर्व जातीधर्मातील नागरिकांना एकत्र करून जातीय सलोखा निर्माण केल्यानेच बोईसर मध्ये कधीही जाती वादाच्या घटना घडल्या नाहीत, कायदा सुव्यवस्था सुरळीत राहिले आहे कोरोणा काळात कामगारांना व सामान्य नागरिकांनाही आमच्यासह इतर सामाजिक संघटनांच्या मदतीने मोठी मदत केली होती.”
नीलिम संखे, बोईसर शिवसेना विधानसभा प्रमुख संघटक

“सर्व राजकीय नेत्यांना योग्य मार्गदर्शन करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कार्यकाळा मध्ये एखादी घटना घडली की तात्काळ छडा लागत आसल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली होती. तसेच कोरोना काळात आमच्यासह इतर सामाजिक संघटनांना घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारे कामगार व सामान्य नागरिकांना मदत केली.”
भावेश चुरी, मनसे पालघर उपजिल्हाध्यक्ष

“औद्योगिक वसाहतीमधील कामगारांवर उपासमारीची वेळ आली तेव्हा योग्य नियोजन करत मोठ्या प्रमाणात अन्नदान करत इतर विविध सुविधा पुरवल्या होत्या. चांगल्या स्वभावाचे साहेब आसल्याने सर्व राजकीय व सर्वसामान्य नागरिकांच्या एकदम जवळचे अधिकारी म्हणून परिचित होते. बदली तात्काळ रद्द व्हावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेतून पुढे येत आहे.”
अशोक वडे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष भाजप

“कामगारांच्या न्यायासाठी आग्रही कसबे साहेब कारखान्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्हाला नेहमी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होते. कसबे साहेबांचे कारखानदारांना नेहमीच सहकार्य लाभले आहे. त्यांची बदली झाल्याने आम्हाला दुःख होत आहे.”
दिनेश शर्मा, उद्योजक बोईसर

“बोईसर शहरामध्ये कधीही जातीयवाद साहेबांच्या कार्यकाळात निर्माण झाले नाहीत. आमची ईद असेल, दिवाळी असो किंवा नाताळ, नवरात्र, गणपती उत्सव सर्व गुण्यागोविंदाने पार पडल्या आहेत. बोईसरकर कसबे साहेबांचे योगदान कधीच विसरणार नाहीत कारण ते बोईसर कुटुंबाचा भाग आहेत त्यामुळे बोईसरकर त्यांची बदली रोखणारच”
जियाउल हक्क चौधरी, बोईसर ग्रामस्थ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here