MUMBAI e NEWS :
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.

“आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीचं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असा कायदा करु असं आश्वासनही दिलं.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पीडितेच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त करत आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी पीडितेला श्रद्धांजली असल्याचं म्हटलं होतं. “हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे,” असंही ते म्हणाले.

अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल. पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल”. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट वसियांच्या दुःखात सहभागी आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here