पालघर – योगेश चांदेकर:
१९ एप्रिल- पालघरमध्ये मॉब लिंचिंगची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे, पालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे, त्यामुळे या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
शेकडो ग्रामस्थांनी हल्ला केला
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 100 हून अधिक गावकऱ्यांनी चोर समजून या तिघांची गाडी थांबविली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.