नवी दिल्ली:
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरुवातीला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. अजूनही कोरोनाचा संसर्ग होऊन नवीन रुग्ण सापडत असल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या अगोदरच पंजाबमध्ये १८ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने ग्रीन झोन, ऑरेंज झोन व रेड झोनमध्ये येणाऱ्या देशातील जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. यापुढील लॉक डाऊन वाढविण्याबाबत निर्णय राज्यांनी घ्यावा असे केंद्राने जाहीर केले होते मात्र कोरोनाचे संकट विचारात घेता कोणतीही जोखीम पत्करायला केंद्र सरकार तयार नाही. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील केंद्राच्या लॉक डाऊन वाढवण्याच्या निर्णयाचं स्वागत केले आहे.