पालघर: ‘कन्सेंट टू ऑपरेट’ प्रकरणी वरिष्ठांकडून चौकशीचे संकेत; मुंबई ई न्यूजचा पाठपुरावा ठरतोय निर्णायक..!

0
424

पालघर – योगेश चांदेकर:

तारापूर एमआयडीसीतील केमीकल कंपन्यांना कोणतीही पाहणी न करता ‘कन्सेंट टू ऑपरेट’ची परवानगी देणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांसह संबंधित कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे. याप्रकरणी मुंबई ई न्यूजचे विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी कंपन्यामधील परिस्थीची शहानिशा करून याबाबतची माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी होळकर यांना दिली होती. परंतु या अधिकाऱ्याने प्रकरण गांभिर्याने न घेता दुर्लक्ष केल्याचेच आत्तापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे याप्रकरणी मुंबई ई न्यूजने प्रदूषण नियंत्रण महामंडळातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता त्यांनी चौकशी करण्याचे संकेत दिले आहे आहेत.

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये अनेकवेळा गुढ अपघाती स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो कामगार कायमस्वरूपी गंभीर जखमी झाले आहेत. असे असताना प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी मात्र कंपन्यांमधील परिस्थितीची पाहणी न करताच त्यांना ‘कन्सेंट टू ऑपरेट’चे प्रमाणपत्र देत असल्याचे उघड झाले आहे. हे प्रमाणपत्र देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये असून यामुळेच धोकादायक परिस्थितीत देखील केमिकल कंपन्यांना ही प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे बोलले जात आहे.

याप्रकारची घटना २०१७ मध्ये एका राजकीय नेत्याच्या कंपनीला दिलेल्या ‘कन्सेंट टू ऑपरेट’ प्रमाणपत्रामुळे उघड झालीय. या कंपनीत उत्पादनासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक चिमणी, बॉयलर, रिएॅक्टर, चिलिंग हब, कॉलम या गोष्टीच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले होते. याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये कंपनीला भेट दिली असता कंपनीचे गेट बंद असल्याने पाहणी करता आली नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले.

दरम्यान कंपनी प्रशासनाकडून कधी वाढीव क्षमतेसाठी कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट तर कधी कन्सेंट टू ऑपरेटच्या नूतनीकरणासाठीही परवानगी मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना यानंतर देखील संबंधित अधिकाऱ्याने भेट देऊन पाहणी करणे गरजेचे असताना अद्याप भेट दिली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जर कंपनीची पाहणी न करताच अशी प्रमाणपत्रे दिली जात असतील तर ही खूप मोठी गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कंपन्यामधील सुरक्षिता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर जर या कंपन्यांमध्ये काही उत्पादनच होत नसेल तर नेमक्या कोणत्या कारणाने या कंपन्या इथे आपले अस्तित्व राखून आहेत, कंपन्याच्या अंतर्गत भागात नेमके काय चालते, कुठल्या प्रकारच्या मालाची ने-आण केली जाते हे देखील तपासणे गरजेचे आहे.

संबंधित प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीच अशा कंपन्यांना पाठिशी घालत असून लोकांच्या जिवाशी खेळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here