पालघर-योगेश चांदेकर
पालघर-आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहे बंद होणार नाहीत, तसा महाराष्ट्र शासनाचा कोणताही प्रस्ताव नाही असे सांगत विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये, हवालदिल होऊ नये असे आवाहन आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री) विवेक पंडित यांनी केले आहे. याबाबत सोशल मीडियावर फिरत असलेली बातमी निराधार असल्याचे सांगत पंडित यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला आहे.
काल पासून आदिवासी वसतिगृह बंद होण्याचा शासनाचा निर्णय आहे, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याबाबत काही वृत्त वाहिन्यांनीही बातम्या दाखवल्या होत्या, या बातमीने आदिवासी विद्यार्थी हवालदिल झाल्याचे दिसले. याबाबत आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राजमंत्री) विवेक पंडित यांनी तातडीने आदिवासी विभाग आयुक्त किरण कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधत याबाबत तपशील जाणून घेतले. आदिवासी विद्यार्थ्यांची वसतीगृहे बंद करण्याचा महाराष्ट्र शासनाचा कोणताही प्रस्ताव असल्याचे कुलकर्णी यांनी पंडित यांच्याजवळ स्पष्ट केले, उलट नवीन आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृहे निर्माण करण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. तशी वसतिगृह प्रस्तावित आहेत असेही ते म्हणाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये असे आवाहन विवेक पंडित यांनी केले आहे.