मुंबई,दि.९ : दिवसेंदिवस पीक उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करावा लागतो. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बी-बियाण्यांचे वाढलेले दर, मजूरी, वीज – पाणी यांचा वाढलेला खर्च यामुळे उत्पादन खर्च देखील भरमसाठ वाढतो. ही बाब ध्यानात घेत राज्य सरकारने २०१८–१९ च्या खरीप हंगामाच्या तुलनेत २०१९–२० च्या खरीप हंगामात पीकनिहाय किमान आधारभूत किंमतीतवाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये १३ पिकांच्या हमीभाबाबत वाढ करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केल्याची माहिती राज्याचे महसूल, कृषी, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
कृषी मूल्य आयोगाकडून याबाबत माहिती घेण्यात आली असून प्राप्त माहितीच्या आधारे १३ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीतवाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला असून यामध्ये धान, ज्वारी,बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल व खरीप कांदा या पिकांचा समावेश आहे. या पिकांच्या हमीभावात साधारणपणे १० टक्क्यांनी वाढ करण्याची शिफारस राज्य सरकारने केली आहे.
लोकशाही न्यूज, कोल्हापूर