मुंबई, दि. 25 : राज्यात स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो यांसारख्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून प्रत्येक रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात साथीच्या आजारांवरील औषधांचा साठा मुबलक प्रमाणात असून स्वाईन फ्लूवरील प्रभावी टॅमीफ्लूच्या सुमारे नऊ लाख गोळ्या राज्यात उपलब्ध आहेत, असा दिलासा देतानाच सर्वच जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी टीमवर्कने काम करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

आरोग्य भवनमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  संवाद साधत साथरोग नियंत्रणाबाबत उपाययोजनांचा श्री.शिंदे यांनी आढावा घेतला. साथरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांचा एकत्रित आढावा घेण्यात येऊन राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य, महसूल, महापालिका यांच्या समन्वयातून स्थानिक पातळीवर साथरोगाबाबत माहिती घेऊन  उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यंत्रणांच्या अडचणी समजावून घेतानाच त्याबाबत मार्गदर्शन केले.

 

आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबद्दल माहिती देताना आरोग्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, आजच्या आढावा बैठकीत राज्यातील स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरीया, लेप्टो आदी साथीच्या आजारांबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. स्वाईन फ्लूची लक्षणे दिसताच उपचाराला विलंब करू नका अशी स्पष्ट निर्देश खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्राने स्वाईन फ्लूवरील उपचाराचा आणि रुग्ण व्हेंटीलेटवर ठेवण्याचा जो प्रोटोकॉल तयार केला तो देशात सर्वोत्तम असून आता केंद्र शासन त्याचा अंगिकार करून संपूर्ण देशात लागू करणार असल्याचे आरोग्यमत्र्यांनी सांगितले.

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसोबतच जनजागृती मोहिम हाती घेण्याचे निर्देश महापालिकांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य,महापालिका, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाय करावेत सोबत आयएमए यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील अन्य संस्थांची मदत घेण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यात स्वाईनमुळे जानेवारी ते जुलै यादरम्यान १९२ मृत्यू झाले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती केंद्र नष्ट करण्यासाठी महापालिकांनी मोहिम हाती घेतली पाहिजे. यासंदर्भात मुंबई महापालिकेमार्फत मुंबई महापालिका अधिनियमातील कलम ३८१ प्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाते त्याप्रमाणे अन्य महापालिकांनी कारवाई करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. अर्धवट बांधकामे असतील तेथे पाणी साचून डासांची उत्पत्ती होते अशावेळी नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देतानाच पाण्याच्या टाक्या, टायर्स, फुलांच्या कुंड्या यामध्ये साचलेले पाणी त्वरीत काढावे, आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात डेंग्यूचे १५५६ रुग्ण असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मलेरीया नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे १४०० गावांत फवारणी करण्यात आली असून आता पर्यंत ४ लाख मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

२८ जुलैला जागतिक हेपेटायसीस दिवस असून यादिवशी देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातून होत आहे. यादिवशी नागरिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत निधीची कमतरता नसून त्यामुळे शस्त्रक्रिया थांबवू नका, असे निर्देश यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिले.

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रियेला गती मिळाली असून गट ब ची भरती सुरू असून गट अ ची प्रक्रिया देखील सुरू होणार असल्याचे सांगत आरोग्य विभागाच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने अजून प्रयत्न करावेत. साथीच्या आजारांना प्रतिबंध करावयाचा असल्यास जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना सजग करा आणि आरोग्य विभागाबद्दल विश्वास निर्माण करून प्रामाणिक प्रयत्नातून मोहिम यशस्वी करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here