पुणे (१२ मार्च) – राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे भारतीय ऊस उद्योगाच्या समस्यांबाबत येत्या १५ मार्च रोजी पुणे येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष प्रोफेसर विजय पॉल शर्मा (नवी दिल्ली) करणार असून भारतीय कृषी संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. आर के सिंग हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनॅजमेण्ट येथे हा परिसंवाद होणार असून “भारतीय ऊस उद्योगा समोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना” हा या परिसंवादाचा विषय आहे. परिसंवाद दोन सत्रात होणार असून डॉ. ए .डी. पाठक, डॉ. बक्षी राम, विकास देशमुख, डॉ आर विश्वनाथन, डॉ शरणबसप्पा, डॉ अमरिश चंद्रा, डॉ पांडुरंग मोहिते आदी तज्ज्ञ ऊस व साखर उद्योग, त्यातील सध्याच्या समस्या यावर मार्गदर्शन करणार आहेत.
परिसंवादास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादात देशभरातील सहकारी व खाजगी कारखान्यांचे १२५ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मा. डॉ बक्षी राम, संचालक, ऊस प्रजनन संस्था,कोईम्बतूर (तामिळनाडू) यांना ऊस वाण को ०२३८ या जातीच्या निर्मितीबद्दल व त्याच्या एकूण संशोधनाबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
By mumbaienews.com