वर्धा (१४ मार्च) : लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना अध्याप काँग्रेस चा उमेदवार ठरत नसल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.
मागील २०१४ च्या लोकसभा निवडणूकीवेळी पक्षांतर्गत निवडणुका घेऊन दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यंदा चारुलता टोकस आणि एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांच्यात उमेदवारीसाठी चुरस दिसून येत आहे. सध्या या दोघाही इच्छूकांनी आपला डेरा दिल्ली टाकला असून वरिष्ठांच्या भेटीगाठी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लोकसभेचा इतिहास बघता वर्ध्याचे पहिले खासदार काँग्रेसचे श्रीमन्नारायन अग्रवाल हे होते. त्यानंतर कमल नयन बजाज, वसंत साठे, रामचंद्र घंगारे असे अनेक अभ्यासू उमेदवार वर्धेकरांनी निवडून दिले होते. त्याचबरोब तब्बल चार वेळा हिंदी भाषिक उमेदवारांनीही वर्धेकरांनी निवडून दिले होते.
गेल्या पंधरा वर्षात दत्ता मेघे परिवाराच्या भोवती राजकारण फिरू लागल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या या मतदारसंघात एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल हा नवीन चेहऱ्यानेही एंट्री केलीय. शैलेश अग्रवाल शेतकरी आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आग्रही असून त्यांचा शेतकरी वर्गात चाहता वर्ग आहे. तर दुसरी कडे प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस या देखील गेल्या तीन टर्म पासून उमेदवारी मागत असून त्या महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष आहेत. टोकस या अभ्यासू असून त्यांची गांधी घराण्याशी जवळीक असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
By mumbaienews.com