अमरावती (१३ मार्च) – विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १७ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. यासंदर्भाचे निवेदन विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
गेल्या अनेक वर्षा पासून अमरावती जिल्ह्यातील प्रकल्प ग्रस्तांचा संघर्ष पेटला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे शासनाने नेहमीच दुलर्क्ष केल्याची भावना शेतकरी वर्गात आहे. त्यामुळे आपल्या न्याय व हक्काच्या मागण्या संदर्भात विदर्भ बळीराजा संघर्ष समितीच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भातील प्रकल्प ग्रस्त एकवटले आहेत. संघर्ष समितीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत. तरी देखील शासन प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीवर विदर्भातील हजारो प्रकल्प ग्रस्त बहिष्कार टाकणार असल्याचे विदर्भ बळीराजा प्रकल्प ग्रस्त समितीचे अध्यक्ष मनोज चोहान यांनी सांगितले आहे. तसे निवेदन ही त्यांनी दर्यापूर तहसीलदार यांना दिले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठकी झाल्या आहेत. परंतु निर्णय मात्र झालेला नाही. मागील महिन्यात या प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले होते. त्यानंतर त्यांना मंत्रालयात चर्चे करीता बोलाविण्यात आले होते. मात्र बैठकीत कोणताच निर्णय न झाल्याने अखेर या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
By mumbaienews.com