कुपोषण निर्मूलनासाठी आणखी एक पाऊल.
पालघर-योगेश चांदेकर
पालघर- पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येकी २ किलो तुरडाळ व १ किलो खाद्य तेल मोफत देण्याच्या पथदर्शी योजनेचा शुभारंभ आज राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष श्री विवेक भाऊ पंडित (राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते करण्यात आला. कुपोषणामुळे जव्हार मोखाडा तसेच राज्यातील इतर भागात शेकडो बालकांच्या मृत्यूमुळे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विवेक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली तिव्र आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी ‘भुक’ हे कुपोषणाचे मुख्य कारण आहे हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मान्य मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस असल्याचे श्री पंडित यांनी सांगितले. त्यामुळे या भूकेवर उपाय म्हणून श्री विवेक भाऊ पंडित यांच्या संकल्पनेतून जव्हार व मोखाडा तालुक्यातील ४०१९२ आदिवासी नागरिकांना २ किलो तुरडाळ व एक किलो खाद्य तेलाचा लाभ मिळणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाला ६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकार तर्फे ही योजना ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास संपुर्ण राज्य ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच संपुर्ण देशात पहिल्यांदाच जव्हार व मोखाडा येथे अशाप्रकारची योजना राबविण्यात येत असल्याचे श्री पंडित यांनी सांगितलेसांगितले. यावेळी मार्ग दर्शन करताना “आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जर एखाद्या स्वस्त धान्य दुकानदाराने तुरडाळ किंवा खाद्य तेल काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केला तर अशा दुकादारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार ( essential commodities act) गुन्हे दाखल करण्याचे आदेश श्री पंडित यांनी दिले.
अंगणवाडी केद्रांच्या माध्यमातून मुलांना, गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना घरी शिजवून खाण्यासाठी कडधान्य दिले जाते, मात्र कुटुंबातील सर्व सदस्य ते कडधान्य खातात, कारण संपूर्ण कुटुंबच कुपोषीत अअसते त्यामुळे त्याचा लाभ होत नाही. येथील आदिवासी नागरिकांनची क्रयशक्ती कमी असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे पोषण व्हावे, ( पुरेसे प्रोटीन व कार्बोहाइड्रेट मिळावी) त्यांची रोगप्रतिकारशक्ति वाढावी यासाठी या योजनेद्वारे मोफत डाळ व खाद्य तेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण देशातल्या नागरिकांचे सरासरी आयुष्य ६५ वर्षे असताना आदिवासींचे आयुष्य ५० वर्ष इतके कमी झाल्याचे सांगून पंडित यांनी चिंता व्यक्त केली.
जव्हार येथील आदिवासी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला श्री विवेक भाऊ पंडित यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी श्री संजय अहिरे, जव्हार व मोखाडा येथील तहसिलदार व पुरवठा अधिकारी, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. हेमंत सावरा तसेच इतर अधिकारी व मान्यवरांसह आदिवासी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.