प्रत्येकाला सुखाचा घास,सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल

श्रमजीवी संघटना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संघर्षाचा एल्गार

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-1982 साली स्थापन केलेल्या श्रमजीवी संघटनेला आज 37 वर्ष पूर्ण झाली. विवेक आणि विद्युलता पंडित या ध्येयवादी दाम्पत्याने आपल्या तारुण्यात लावलेले हे इवलेशे रोपटे आज लाखभर लोकांचे कुटुंब असलेले महाकाय वटवृक्ष झाले. यानिमित्त आज संघटनेच्या मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज झालेल्या या कार्यक्रमात “दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईला सज्ज व्हा” असे आवाहन श्रमजीवी सैनिकांना केले. कवीवर्य वसंत बापटांच्या कवितेचा संदर्भ देत प्रत्येकाला सुखाचा घास आणि सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवी संघटनेचा संघर्ष कायम राहील असेही पंडित यांनी यावेळी सांगितले.

वेठबिगार मुक्तीच्या लढ्यातून उदयास आलेली श्रमजीवी संघटना आज राज्यातील आदिवासी कष्टकरी बांधवांच्या न्याय्यहक्कासाठी लढणारे प्रमुख शक्तीस्थळ बनले आहे. आदिवासी सोबत इतर सर्व जाती धर्मातील दुर्बल अन्यायग्रस्तांच्या हक्कासाठी ससर्वप्रथम आवाज उठवणारी श्रमजीवी संघटना सर्वाना परीचीत झाली आहे. 19 ऑक्टोबर रोजी संघटनेला 37 वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने आज उसगाव या संघटनेच्या मुख्यालयात वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी पंडित आपल्या मनोगतात पुढील वाटचालीची दिशा दिली. आपण लढत आहोत, मात्र स्वातंत्र्याचा प्रकाश आजही गरीब सर्वसामान्यांच्या झोपडित पोहचला नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्वतंत्र्यवीरांचे स्वप्न साकार होईपर्यंत लढावे लागेल असेही ते म्हणाले. 2022 या वर्षात स्वातंत्र्याची पंचाहत्तरी येते, मात्र तरीही आदिवासी गसरीब दुर्बल घटक आजही भुकेला आहे, निवाऱ्याची सोय नाही , दारिद्य्र पाचवीला पूजलेय ते तसेच आहे, ही परिस्थिती बदल्याचा संकल्प करून 26 जानेवारी 2020 पासून निर्णायक संघर्ष लढ्याला सुरवात करणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अतिथी असलेल्या गजानन प्रभूशेळपकर सर, आमदार श्रीनिवास वनगा, माजी आमदार विलास तरे, डॉ.हेमंत सवरा, विनायक निकम, पत्रकार शरद पाटील, प्रशांत पाटील इत्यादी मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या मनोगतात संघटनेला भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी पूर्वीच्या काळात आदिवासी बांधव गावात उपलब्ध असलेल्या रानभाज्या, कंदमुळे, आंबील पेज,कडू कांद,बेलकड ची भाजी, चवळी करांदे इत्यादी पदार्थ बनवून जुन्या आठवणी ताज्या करत मान्यवरांना या अनोख्या भोजनाचा लाभ दिला. यावेळी स्वतः विवेक पंडित, सर्व मान्यवर आणि संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ससभासद उपस्थित होते. सभासदांनी आज पारंपरिक नाच आणि वेशभूषा करून हा दिवस साजरा केला, उद्यापासून ठाणे ,पालघर,रायगड आणि नाशिक जिल्ह्यात पुढील पूर्ण आठवडा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन हा वर्धापन सप्ताह सुरू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here