योगेश चांदेकर,(पालघर)Mumbai e News
पालघर जिल्ह्याची नवनिर्मिती झाल्यानंतर नूतन जिल्हा भरती प्रक्रियेत शासनाने स्थानिकांना डावलले गेले होते .त्यामुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.त्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे ह्यांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते.या प्रकरणी सबळ पुराव्याअभावी या आंदोलकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन झाल्यामुळे शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली होती. व सदर आंदोलन जिल्ह्यात गाजले होते. त्या वेळेस पालघर पोलीस स्टेशन चे तत्कालीन पोलीस निरीक्षक निलेश माईंकर ह्यांनी आंदोलन प्रकरणी मनसे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे , पालघर लोकसभा अध्यक्ष मनवीसे धीरज गावड , उपतालुका अध्यक्ष सुनील पाटील , विभाग संघटक मनीष पाटील , भुपेंद्र वैद्य , माधुरी संखे , कामिनी पाटील ,नीता राऊत ह्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता .
या आंदोलनाची मोठी चर्चा परिसरात झाली होती.प्रकरणी ४ वर्ष झालेल्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी वेगवेगळे पुरावे सादर केले होते सदर प्रकरणात आरोपींकडून ऍड. विजय संखे तर सरकारी पक्षा कडून ऍड.दातरंगे यांनी बाजू मांडली होती. सदर प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल देत असताना प्रथम वर्ग सहदिवाणी न्यायाधीश श्री.तेलंगावकर ह्यांनी सरकारी पक्ष सबळ पुरावा न देऊ शकल्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता केली .