पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्हयाचा विस्तार हा खुप मोठा असुन नागरी व डोंगरी अशा दोन भागात विभागलेला आहे. पालघर जिल्हयातील सर्व सामान्य जनता व पोलीस यांच्यामध्ये समन्वय वृद्धिंगत करण्यासाठी पालघर पोलीस दलाने “अभियान विश्वास” हे अभियान हाती घेतले असुन ते संपुर्ण पालघर जिल्हयात राबविण्यात येत आहे. पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना दत्तात्रय शिंदे यांनी जिल्हाभर लोकसंवाद वाढवण्यासाठी सायकलवरून दौरा केला होता. पंधरा दिवस पोलीस अधिकाऱ्यांचे पथक सायकलवरून जिल्हाभर फिरले होते. सामान्य माणसाला पोलीस हे मित्र वाटायला हवे त्यांच्यामध्ये सुसंवाद असावा हा यासाठी ते आग्रही आहेत.
‘अभियान विश्वास’ या अभियानाअतंर्गत पालघर जिल्हयातील सर्व अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी हे त्यांचे हद्दीतील गावांना नियमित भेट देणार आहेत. गावातील रहिवाशी यांचेशी सवांद साधुन पोलीस व जनता यांचेत सुसवांद असावा याकरिता स्थानिक जनतेची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेवुन, ग्रामीण भागांमध्ये चालणारे अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधाबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भेटीदरम्यान प्रत्येक गावामध्ये जास्तीत-जास्त ‘पोलीस मित्र’ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व बिट अंमलदार यांच्याशी संपर्क साधणेबाबत आवाहन करुन पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व संबधीत बिट अंमलदार यांनी त्यांचे व नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक सर्व गावकऱ्यांना उपलब्ध करुन देणार असल्याने पालघर जिल्हयामध्ये सर्व सामान्य जनतेला पोलीस दलाशी संपर्क व समन्वय साधता येईल अशी माहिती यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
“जास्तीत जास्त लोकांशी पोलीसांचा संपर्क राहिल्याने पोलीस मित्र तयार होतील. नागरिकांशी उत्तम समन्वय निर्माण झाल्यास काम करत असताना पोलीसांना मदत होईल याशिवाय लोकांच्या मनामध्ये देखील प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका वाढेल. सर्व अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी हे त्यांचे हद्दीतील गावांना नियमित भेट देणार आहेत.” – पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे