पालघर – योगेश चांदेकर:
रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची लुबाडणुक प्रकरणातील फरार आरोपी निलेश गणपत पाटील व आरोपी गणेश किसन आडगा यांनी सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. यावरील सुनावणी दरम्यान आरोपी निलेश गणपत पाटील याचे काम पाहणाऱ्या ॲड. टावरे यांनी आरोपीच्या अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज मागे घेतला. आरोपी गणेश किसन आडगा याच्या अटकपूर्व जामीनासाठीच्या अर्जावरील सुनावणी १३ जुलै रोजी होणार आहे.
सध्या या प्रकरणातील आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. दरम्यान अटकेत असलेल्या एका आरोपीस कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीच्या दृष्टीने सर्वच आरोपींना सुनावण्यात आलेल्या पोलीस व न्यायालयीन कोठडीस स्थगिती देत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले. तपासणी दरम्यान पोलीसांनी आरोपी मधुकर सखाराम काकरा याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याने आरोपी निलेश पाटील यास ४० लाख रुपये दिल्याच्या नोंदी असल्याचे पुरावे मिळाल्याची नोंद पोलीसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये नोंदविण्यात आले आहे. फरार आरोपी निलेश गणपत पाटील यास अटकेतील आरोपी मधुकर सखाराम काकरा याने ४० लाख रुपये, नारायण कान्हा डबके याने २८ लाख रुपये दिल्याचे पुरावे मिळाल्याची देखील नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप भोस करत आहेत.
दरम्यान सध्या यातील ५ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी निलेश पाटील याचा अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी केलेला अर्ज मागे घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आरोपीच्या विरुद्ध पोलीसांना पुरावे मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा अर्ज मागे घेतला असू शकतो अशी लोकांमध्ये चर्चा आहे.
मुंबई ई न्यूजच्या आवाहनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद:
पालघर आर्थीक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत परदेशी यांनी मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांनी पुढे येत संपर्क करण्याचं आवाहन केलं होत. याला प्रतिसाद देत आज ९ अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपला जबाब नोंदविला आहे. मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत या प्रकरणाला वाचा फोडली. याप्रश्नी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शासन होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका मुंबई ई न्यूजने घेतली आहे. मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक प्रशांत परदेशी यांनी केलेल्या आवाहनामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाल्यानेच ते निर्भीडपणे समोर येत आहेत हे यातून स्पष्ट दिसतं आहे. .