Mumbai E News Network :
भारत आणि चीन सैनिकांमध्ये १५ आणि १६ जून रोज गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. या परिसरात तैनात असलेले जवान जखमी झाले आहेत. त्यातील २० जण शहीद झाले. भारतीय लष्कर देशाच्या अखंडतेसाठी आणि संरक्षणासाठी कटीबद्ध आहे अशी प्रतिक्रिया भारतीय लष्काराने दिली आहे. भारतीय सूत्रांनुसार चीनच्या ४३ सैनिकांपैकी काहींचा मृत्यू तर काही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांना
कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं एका शहीद जवानाच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर करत कडल सॅल्यूट ठोकला.
गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी नि:शस्त्र भारतीय जवानांवर लोखंडाच्या सळ्या, दांडके, दगडं अशा हत्यारांनी हल्ला केला. या हल्ल्यात झालेल्या २० शहीद जवानांची नावं जाहीर करण्यात आली आहे. कर्नल संतोष बाबू (हैदराबाद), नंदुराम सोरेन (मयुरभंज), मनदीप सिंग (पटियाला), सतनाम सिंग (गुरुदासपूर), हवालदार के पालानी (मदुराई), हवालदार सुनील कुमार (पटना), हवालदार बिपुल रॉय(मेरठ शहर), दिपक कुमार (रेवा), राजेश ओरंग (बिरघम), कुंदनकुमार ओझा (साहीबगंज), गणेश राम (कांकेर), चंद्रकांता प्रधान (कंधलमाल), अंकुश (हमीरपूर), गुरुबिंदर (संगरुर), गुरुतेज सिंग (मानसा), चंदन कुमार (भोजपूर), कुंदन कुमार (साहरसा), अमन कुमार (समस्तीपूर), जय किशोर सिंग(वैशाली), गणेश हंसदा (पूर्व सिंगभूम) अशी शहीद जवानांची नावं आहेत.
यातील बिहार येथील साहरसा येथे राहणाऱ्या कुंदन कुमार याच्या वडिलांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ वीरूनं पोस्ट केला. कुंदन कुमार यांचे वडील म्हणाले की,’ मुलानं देशासाठी बलिदान दिलंय. मला दोन नातवंड आहेत आणि त्यांनाही मी सीमेवर पाठवण्यास तयार आहे.” त्यांच्या या निर्धारावर वीरूनं कडल सलाम ठोकला. वीरून लिहिलं की,”हे आहेत ईश्वररुपी माणूस.. चीनला लवकरच आरसा दाखवण्यात येईल.”