पालघर – योगेश चांदेकर:
कोरोना काळात विद्यार्थ्यांना शुल्क माफी द्यावी यासाठी धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या अभाविपच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचे महाराष्ट्रभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी ‘महाराष्ट्रातील सरकार नक्की कोणाचे? मुघलांचे की ब्रिटिशांचे’ अशा घोषणा देत पालघर मधील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

लोकशाहीमध्ये विद्यार्थ्यांना संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याची मुभा असताना महाराष्ट्रातील सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी भाजयुमोने केला आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे, परीक्षा शुल्क परत मागणे हा गुन्हा नसून आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची संवेदनशीलतेने दखल घेण्याऐवजी पालकमंत्री अब्द्दुल सत्तारांनी विद्यार्थ्यांना पोलिसांकरवी मारहाण करणे संतापजनक असल्याचे पालघर भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष समीर पाटील यांनी म्हंटले आहे. याप्रकरणी भाजयुमोच्या वतीने पालघरचे तहसीलदार ह्यांना निवेदन देण्यात आले आहे.