मुंबई | ‘टुलकिट’ म्हणजे काय? ते सामान्य जनतेला माहीत नाही, पण त्या ‘टुलकिट’ने मोदी सरकारला नक्कीच अस्वस्थ केले. आता समाजमाध्यमांवर बंदी घालण्याचा विचार मोदींचे सरकार करीत आहे. याच समाजमाध्यमांचा वापर करून 2014 आणि 2019 च्या निवडणुका मोदी व भाजपने  जिंकल्या. आता ‘टुलकिट’ उलटले आहे’ असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. तसंच, यालाच म्हणतात, ‘कालाय तस्मै नमः’ उत्तर कोरियातील हुकूमशहा किंम जोंग याने त्याच्या देशात ‘ट्विटर’ वगैरेंवर बंदीच घातली. आता मोदींच्या देशातही ‘सोशल माध्यमां’वर बंदी येत आहे’ अशी तुलना राऊत यांनी केली.

सोशल मीडियावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. याच मुद्यावरून संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘फेसबुक, ट्विटर, यू टय़ूबवर बदनामीच्या मोहिमा राबवायच्या. हे तंत्र आता गोबेल्सच्याही पुढे गेले. त्याचा सगळय़ात जास्त गैरवापर भाजपने केला हे सत्य आहेच, पण त्यावर नियंत्रण हवे, असे आता देशातील मोदी भक्तांना वाटू लागले हे आश्चर्यच आहे. 2014 पासून 2019 पर्यंत याच माध्यमांचा वापर करून भारतीय जनता पक्षाने विरोधकांना नामोहरम केले.

डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यावर यथेच्छ चिखलफेक करण्यासाठी याच माध्यमांचा वापर केला. आज त्याच माध्यमांचे ‘टुलकिट’ भाजपवर उलटले आहे व सोशल मीडियावर ‘बंदी’ घालण्याची हालचाल केंद्र सरकारने सुरू केली. ट्विटर, फेसबुकवर नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची ‘कोरोना’ हाताळणीसंदर्भात बदनामी होत आहे, असे सांगणे म्हणजे काळाने त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे’ अशी टीका राऊत यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here