कोरोनाचा प्रादुर्भाव पालघर जिल्ह्यात नाही

0
424

पालघर-योगेश चांदेकर:

चीनमधील घातक पद्धतीचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झालेला नाही. तसेच राज्यात एकही संशयीत रुग्ण आढळलेला नसून नागरीकांनी भीती न बाळगता सतर्कता ठेवावी. सामान्यांनी मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करतानाच अधिक काळजी घेतानाच सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेत केले.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सज्जतेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, जगात 76 देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जगात ज्या पद्धतीचा विषाणू धुमाकूळ घालतोय तसा विषाणू जिल्ह्यात नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही.

कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी मुंबई पाठोपाठ पुणे आणि नागपूर येथेही सोय करण्यात आली आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी आवश्यक तो वाढीव डॉक्टर्स आणि कर्मचारी देखील शासनाने दिले आहेत.

जनतेने घाबरून जाऊ नये. पुढील १० ते १५ दिवस अधिकची सतर्कता बाळगावी. सार्वजनिक ठिकाणई अनावश्यक गर्दी टाळावी. होळीच्या सणाचा आनंद घेताना त्याचे स्वरूप मर्यादीत ठेवा.

नागरिकांनी मास्क लावून फिरण्याची गरज नसून हात रुमालाने प्रतिबंध करावा. शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करावा, अर्धवट शिजलेले अन्न किंवा कच्चे मास खाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी केले.

हवेतून पसरणारा आजार नसून खोकल्यानंतर, शिंकल्यानंतर उडणाऱ्या थुंकीतून प्रसार होणारा आहे. जिल्ह्यात एकही संशयीत रुग्ण नाही. प्रतिबंधात्मक उपायांतून त्याला रोखता येते. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही.

कोरोनाचा हा नविन प्रकारचा विषाणू आहे. गेल्या दोन महिन्यात त्याविषयी अभ्यास सुरू आहे. त्याची लागण झालेल्या तीन ते पाच टक्के लोकांना वैद्यकीय उपचाराची गरज भासते. २० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांमध्ये त्याची लागण होण्याची शक्यता एक टक्का असते. २० ते ३० वर्षांतील नागरीकांना एक ते दोन टक्के, ५० पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाण असते. ज्याची रोगप्रतिकारक क्षमता चांगली त्याला त्रास होत नाही. शक्यतो हस्तांदोलन टाळावे, हात स्वच्छ धुवावे.असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here