पालघर – योगेश चांदेकर:
पालघर तालुक्यातील माहिम ग्रामपंचायत हद्दित येणाऱ्या साईबाबा नगर येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या संशयितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची माहिती मुंबई ई न्यूजच्या हाती लागली आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याची देखील माहिती येत आहे. कॉमन शौचालय असून त्याची योग्य व वेळेवर साफ सफाई केली जात नाही. त्यामुळे एकत्र क्वारंटाईन करण्यात आलेल्यापैकी एखादा संशयित कोरोनाग्रस्त असेल तर यामुळे इतरांना संसर्ग होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन संभाव्य धोका टाळावा अशी मागणी याठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
साईबाबा नगर क्वारंटाईन सेंटरमधील काही लोकांनी नाव न जाहीर कारणाच्या अटीवर मुंबई ई न्यूजकडे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अक्षरशः पाढाच वाचला. निकृष्ट दर्जाचे जेवण, साफसफाई व निर्जंतुकीकरणाकडे होणारे दुर्लक्ष अशा महत्वाच्या मुद्द्यांवर लवकरात लवकर काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे जिल्हा प्रशासन यागोष्टीकडे लक्ष देऊन उपाययोजना करणार का हे पहावे लागणार आहे.