पालघर- योगेश चांदेकर:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरीक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाय योजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दिनांक ०१ ते ५ एप्रिल, २०२० या पाच दिवसात पालघर जिल्ह्यातील १,९२,०१२ शिधापत्रिकाधारकांना तब्बल ५१०९२ क्विटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती पालघर जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढया दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्हयातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १९०६०२९ लाख आहेत. या लाभाथ्यांना १०८१ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १० किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २५ किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु. किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो गहू पालघर जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे १८३३३क्विटल गहू ३३०४१क्विटल तांदूळ, तर ४१०.५० क्विटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले पंरतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे १८०१५ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टविलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. आणि ३ रु. किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो तांदूळ दिला जातो.
प्रधानमंत्री, गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्डधारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे, त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशनकार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदूळ दिनांक ७ एप्रिल, २० पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगमच्या बोरीवली व भिवंडी येथील डेपोमधून प्राप्त करुन घेतले जात आहे.
दिनांक- ७ एप्रिल, २०२० पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरु करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतचे मे आणि जून मध्ये सुद्धा त्या त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साटेबाजी किंवा चढया दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे यांनी दिली आहे.