पालघर – योगेश चांदेकर:
संपूर्ण देशात संचारबंदी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. ग्रीन, ऑरेंज, रेड असे झोन जाहीर करून खबरदारीची योग्य ती उपाययोजना केली जात आहे. असे असताना बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाइल ही स्टील उत्पादन करणारी कंपनी सुरू असल्याची व या कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार नियम न पाळता कार्यरत असल्याची बाब समोर आली होती. यानंतर पालघर जिल्हाधिकारी यांनी उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतरही आज उत्पादन सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे… ह्या बाबत पालघर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता चौकशी करून तस असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अस सांगण्यात आले.
- “करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही हजारो कामगारांचा आणि परिसरातील लाखो लोकांच्या जीवाची पर्वा न करता काम सुरु ठेऊन उत्पादन घेणाऱ्या विराज प्रोफाइल प्रा. लिमिटेड या तारापूर येथील कंपनीविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी.” – विशाल मोहोड, सामाजिक कार्यकर्ता
दरम्यान अनेक उद्योगांनी आपले उत्पादन बंद ठेवले असताना विराज कंपनीने उत्पादन सुरू ठेवण्याच्या व खबरदारीच्या आवश्यक उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी उपायुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीला या उद्योगातील पाहणी करण्यासाठी पाठवले होते. शासनाच्या आदेशांचे पालन न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र covid-19 उपाययोजना नियम २०२० साथीचा रोग कायदा १८५७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार विराज प्रोफाइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या औद्योगिक वसाहतीमधील दोन तसेच मान व महागाव ग्रामपंचायत हद्दीतील इतर दोन केंद्राला उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते.
कामगारांना हात धुण्यासाठी पुरेशे हँडवॉश, स्टाफच्या व्यवस्थेमधील किमान अंतर राखणे, सोशल डिस्टेंसिंग बाबत प्रवेशद्वार व हजेरी काऊंटरवर आवश्यक खुणांची अंमलबजावणी करणे, कामगारांना आत-बाहेर येण्यासाठी वेटिंग फूट मार्कची सुविधा उपलब्ध करणे, दररोज तपासणी केलेल्या कामगारांची व अधिकारी वर्गाच्या नोंदणी ठेवणे, कॅन्टीन व होस्टेल परिसरात करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी व प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आवश्यक पोस्टर-संदेश लावणे तसेच प्रवास करताना कामगारांमध्ये सुरक्षित अंतर राखणे अशा अनेक नियम व अटींसह शासनाने काही उत्पादकांना पूर्वपरवानगी घेऊन काम सुरु ठेवण्यास सूट दिली आहे.
निर्ढावलेल्या कंपनी प्रशासनावर जिल्हाधिकाऱ्यांनी काम बंद ठेवण्यासंबंधी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने काई कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.