पालघर – योगेश चांदेकर
पालघर- एकीकडे कोरोना व्हायरसने संपूर्ण जग संकटात असतानाच बुधवारी रात्री उशिरा डहाणू, पालघर तसेच तलासरी तालुका भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामीण भागातील आदिवासी यामुळे प्रचंड धास्तावले आहेत.
बुधवारी रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के जाणवले. बोर्डी, धुंदलवाडी, कासा तसेच बाईसर पर्यंत या भूकंपाचे हादरे बसल्याने ग्रामस्थ घाबरून गेले.
अनेकांनी जिवाच्या भीतीने घराबाहेर पळ काढला तर काहींनी अख्खी रात्र अक्षरशः जागून काढली. आधीच कोरोनाचा दुष्काळ त्यात भूकंप म्हणजे तेरावा महिना अशी परिस्थिती पालघर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. या भूकंपामुळे पालघर जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप किती रिश्टर स्केलचा होता हे अद्याप समजू शकले नाही.