पालघर – योगेश चांदेकर:
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलेला असून हा लॉकडाऊन पहिल्यापेक्षा अधिक तीव्र असणार आहे. पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी पोरबंदर, वेरावळ, सौराष्ट्र व मंगरूळ या ठिकाणी अडकून पडले होते. शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने अखेर बोटीवर अडकून पडलेल्या गावकरी मच्छिमारांना पालघरमध्ये आणण्यास सुरुवात झाली आहे..
खलाशांचे नातेवाईक त्यांना परत गावी येऊ द्यावे अशी मागणी करत होते. पालघर जिल्हा प्रशासनाने दखल घेत अखेर त्यांना झाई येथे आणण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिली बोट तलासरी तालुक्यातील झाई समुद्र येथे पोहोचली आहे, त्यामध्ये 90 खलाशी असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यांना शासकीय आश्रम शाळा झाई याठिकाणी पुढील १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी आमदार पास्कल धनारे, तलासरी पंचायत समिती सभापती नंदू हाडळ, तलासरी तालुका अध्यक्ष विनोद मेढा, लूईस काकड, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण वरखंडे, बबला धोडी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्थानिक सरपंच, पोलीस अधिकारी-कर्मचारी, यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. खलाशांना उतरून घेत असताना सोशल डिस्टेंसिंग राखण्यात आले होते.
- “संचारबंदीमुळे राज्याच्या सीमा बंद असल्याने पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी पोरबंदर, वेरावळ, सौराष्ट्र व मंगरूळ या ठिकाणी बोटीतच अडकून पडले आहेत. त्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना पालघरमध्ये आणून पुढील काही दिवस क्वारंटाईन केले जाईल. यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही तसेच कुटुंबीयांची देखील काळजी दूर होईल.” – खासदार राजेंद्र गावित
- “ग्रामस्थांच्या मागणीला यश मिळाले असून, काही खलाशांना याठिकाणी आणण्यात आले आहे. उर्वरित खलाशांना देखील लवकरच आणण्यात येईल. प्रशासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे.” – आमदार विनोद निकोले, डहाणू विधानसभा