पालघर – योगेश चांदेकर:
लॉक डाऊन सुरु होऊन जवळपास दोन महिने पूर्ण होत आले, आदिम समाजातील अनेकांचे हातावरचेच पोट, अशा परिस्थितीत कामधंदा बंद असल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत दोनवेळच्या जेवणाचे नियोजन करत आहेत. यातूनच प्रेरणा घेत हर्ष फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रताप रत्नाकर यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पालघर जिल्ह्यातील आदिम समाजातील १००० कुटुंबाना धान्य वाटप केले आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आदिम समाज हा मोठ्या प्रमाणावर राहतो. त्यापैकी अनेकजण हे भूमिहीन आहेत. त्यामुळे या समाजातील अनेकांना कोरोनाच्या साथीमुळे घरातच बसावे लागतेय. त्यांच्यावर ओढवलेल्या या संकट समयी हर्ष फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे करत १००० कुटुंबाना अन्नधान्याचे वाटप केले आहे. यावेळी सोशल डिस्टेंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.