पालघर : योगेश चांदेकर –
पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचा जम्मू काश्मीर सह भारताला धोका राहिला आहे. पाकव्याप्त काश्मीर मध्ये दहशतवाद्यांचे सर्व अड्डे आहेत. त्यामुळे आतंकवाद संपविण्यासाठी लष्करी कारवाई करून पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे. लष्करदिनानिमित भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केंद्र सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर मध्ये लष्करी कारवाई करण्यास भारतीय लष्कर सज्ज असल्याचा जबरदस्त निर्धार व्यक्त केला आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या या वक्तव्याचे ना. रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.
भारतीय लष्कराचा आम्हाला सदैव अभिमान राहिला आहे. आपल्या भारतीय लष्कराचे शौर्य अतुलनीय असून भारतीय लष्कर सक्षम आणि सदैव सज्ज आहे.त्यामुळे आपण यापूर्वी अनेकदा संसदेत पाकव्याप्त काश्मीर लष्करी कारवाई करून ताब्यात घेण्याची मागणी केली होती. आतंकवाद वाढण्याचे कारण पाकव्याप्त काश्मीर आहे. आतंकवाद्यांचे तेथील सर्व तळं
उद्ध्वस्त केली पाहिजेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीरचा विकास करण्यासाठी आधी आतंकवाद संपविला पाहिजे. त्यासाठी आतंकवाद्यांचे मुख्यस्थळ असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरला भारताने लष्करी कारवाई करून ताब्यात घेतले पाहिजे या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करून ना. रामदास आठवले यांनी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे.