विशाखापट्टणम :
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील आर आर वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर या फार्मा कंपनीतून वायू गळती झाली आहे. सकाळी ही घटना घडली असून यामध्ये बालकासह १० जणांचा मृत्यू झाला आहे.
गॅॅस गळतीमुळे विशाखापट्टणम हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे या गॅस गळतीमुळे 5000 हून अधिक लोक आणि प्राण्यांची प्रकृती बिघडली आहे. तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. हा गॅस जवळपास 3 किलोमीटरपर्यंत पसरत गेला.
आर. आर. वेंकटपुरम येथे असलेल्या विशाखा एल. जी. पॉलिमर कंपनीत ही विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जेथे होते तेथेच कोसळले. एकीकडे करोनाचा उद्रेक झालेला असताना ही दुर्घटना अचानक घडल्याने सगळीकडे हाहाकार उडाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसंच लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.