[पालघर – योगेश चांदेकर ]:
तारापूर औद्यागिक वसाहतीमध्ये फार्मा कंपनीत झालेल्या स्फोटाची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. सदर घटनेतील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री पाटील यांनी पोलिसांना दिल्या आहेत. शनिवारी तारापूर औद्यागिक वसाहतीमध्ये सायंकाळी ७ च्या सुमारास एका कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेऊन होते. जखमींना संपूर्ण उपचार मिळतील याची दक्षता घेण्याची सूचना संबंधित प्रशासनाला केली होती.
सदर स्फोट इतका भीषण होता, की कंपनीच्या इमारतीचा काही भाग कोसळून पडला. धक्कादायकबाब म्हणजे सदर इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतानाच या कंपनीत उत्पादन घेण्याचे काम सुरू केल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, या घटनेची दखल घेत गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच दोषींवर कारवाई करण्याच्या सुचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत.