मुंबई : योगेश चांदेकर –
राज्य सरकारने ४ महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी देशभरात मिशन बिगिन अगेनच्या पुढील टप्प्याची सुरुवात करण्यात आली आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गंत मुंबईतील सर्वच दुकाने आता सुरु राहणार आहेत.
मुंबईत येत्या ५ ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. शिवाय आठवड्यातील सातंही दिवस दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दुकानं उघडण्याची वेळ ही याआधी कमी होती. त्याचप्रमाणे ऑड-इव्हन तत्त्वावर ही दुकानं सुरु होती. मुंबई महापालिकेच्या निर्णयानुसार, आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत ५ ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकानं ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत.
गेले अनेक महिने दुकानं काही दिवस बंद असल्याने दुकान मालकांना बराच आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यासंदर्भात मुंबईतल्या काही दुकानदारांच्या सांगण्यानुसार, मुंबई महापालिकेने दुकांनाबाबत घेतलेला निर्णय चांगला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे दुकानदारांचा नक्कीच फायदा होईल.