MUMBAI e NEWS:
पालघर – योगेश चांदेकर
चिकू महोत्सव साजरा करताना चिकू बागायतदारांना सोबत न घेता केवळ व्यवसायीक दृष्टिकोन ठेवून ठराविक लोकांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. चिकू महोत्सवाला फक्त चिकू या शब्दाची जोडणी दिली जात आहे आणि त्यातून चिकू बागायतदारांना कोणतीही संधी दिली जात नाही. योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे याबद्दल तपासणी करावी असे पत्रच चिकू बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पालघर यांना दिले आहे.
काही व्यक्तिंचा व्यक्तिगत विकास फायदा करण्यासाठी जर हा महोत्सव साजरा केला जात असेल तर चिकू बागायतदारांची सामाजिक बांधिलकीचा खोटा आव आणून हे भासविण्याचा हा उपक्रम असल्याचा आरोप चिकू बागायतदार शेतकऱ्यांनी केला आहे. ह्या ऊपक्रमाला चिकू महोत्सव नाव न देता कोणत्याही दुसऱ्या नावाने साजरा करावा आमची हरकत नसेल, परंतु चिकू नावाने ऊपक्रम साजरा करण्यात येणार असतील तर संपूर्ण चिकू बागायतदारांना माफक दरात संधी ऊपलब्ध करुन देण्यात यावी. कोणताही शासनांतर्गत निधी मंजुर करण्यात येणार असल्यास शासकीय अधिकाऱ्यांनी चिकू बागायतदारांचे मत घेऊनच हा निधी द्यावा. सदर निधी खुल्या मताने जाहीरपणे दयावा अशी विनंती पत्रकाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या अपरोक्ष सदर ऊपक्रमाला मिळत असलेल्या सरकारी निधीबद्दल चिकू बागायतदारांचा आक्षेप राहील. सदर चिकू महोत्सवासाठी गावातील बागायतदार शेतकऱ्यांना माफक दरात संधी मिळत नाही. हि गोष्ट चुकीची असून लोकशाहीसाठी अन्यायकारक आहे. अशा घटनांमुळेच पुढे समाजात मक्तेदारी ऊत्पन्न होते, यातून असंतोषाचे वातावरण निर्माण होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सदर विषयावर निर्णय घेत असताना व कोणताही शासकीय निधी मंजुर करण्याअगोदर संपूर्ण विभागातील बागायतदारांचे मत घेऊनच मान्यता दयावी, अशी विनंती अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील, विनित राऊत यांनी केली आहे.