पालघर – योगेश चांदेकर:
मुंबई ई न्यूजने “कोरोना व्हायरसचं भूत आलं अन उभं पीक मातीमोल झालं..!” या शीर्षकाखाली शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी एक बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची तात्काळ दखल घेत कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी केली होती, तसेच शेतमाल थेट ग्राहकांना वितरित करण्यासाठी शेतकरी गटांना पुढे येण्याचे आवाहन केलं होत.
अनेक शेतकरी गटांशी चर्चा करत त्यांना याकामी येणाऱ्या अडचणी कृषी विभागाने सोडवल्या. कृषी विभागाच्या पुढाकाराने शेतकरी गटांमार्फत वसई विरार येथील गृहसंकुलांमध्ये थेट भाजीपाला विक्री सुरु करण्यात आली आहे. अत्यंत किफायतशीर दराने हि विक्री करण्यात येत आहे. शेतकरी ते थेट ग्राहक असे वितरण होत असल्याने शेतकऱ्यांना देखील योग्य तो मोबदला मिळत आहे. कृषी विभागातील कार्यकुशल व तळमळीच्या अधिकाऱ्यांमुळे भाजीपाला वाया जाऊन होणाऱ्या नुकसानीतून काही शेतकऱ्यांची तरी सुटका झाली आहे. यामुळे शेतकरी व शेतकरी गटांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
चांगल्या प्रतीचा भाजीपाला थेट विक्रीद्वारे अगदी किफायतशीर दरात उपलब्ध करून दिला जात असल्याने सोसायटीमधील पदाधिकारी व सभासद यांनी समाधान व्यक्त केलं आहे.