पालघर: महावितरणच्या ‘त्या जुगाड’चा ३ रा वाढदिवस; जीवघेणं संकट आजही डोक्यावर टांगलेलच..!

0
407

पालघर – योगेश चांदेकर:

एखाद्या वस्तूची दुरुस्ती करण्यासाठी पुरेशी साधन-सामुग्री जवळ नसेल तर आपण भारतीय लोक त्याची तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करण्यासाठी नवनवीन जुगाड लावतो. महावितरण कर्मचाऱ्यांनी लावलेल्या अशाच एका जुगाडाचा आज तिसरा वाढदिवस आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळे भागातील वाढीव या गावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विजेच्या पोलवरील दोन विद्युत तारा तीन वर्षांपूर्वी खाली आल्या होत्या. त्यावेळी खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खाली आलेल्या तारा लाकडी खांबाला टांगल्या होत्या. ग्रामस्थांनी वारंवार सांगून देखील या विजेच्या तारा आज तीनवर्षानंतर देखील आहे त्याच अवस्थेत आहेत.

शेताच्या मध्यभागी असणाऱ्या या विद्युत तारा जमिनीपासून फक्त ५ फुटांवर टांगलेल्या आहेत. त्यामुळे अपघाताने मोठी जीवितहानी देखील आहे. या शेताशेजारूनच एक पायवाट जाते, त्यामुळे अंधारात एखाद्या नवख्या व्यक्तीने याठिकाणहून जाणे जीवावर देखील बेतू शकते. याबाबत अनेकवेळा पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी अनेकदा लेखी स्वरूपात तक्रार देखील केली आहे. त्यामुळे महावितरण या दुरुस्तीसाठी विजेचा धक्का बसून एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

“गेल्या तीन वर्षांपासून ग्रामस्थांकडून वारंवार सांगून देखील महावितरण कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. नवीन पदभार स्वीकारलेल्या बदली होऊन आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याने अमुक इतक्या दिवसांच्या आत काम उरकून घेतो असे सांगितले होते. आज ६-७ महिन्यानंतर देखील त्यांना याची आठवण नाही, उशिरा का होईना निदान आतातरी हा प्रश्न त्यांनी सोडवावा” – राकेश पाटील, ग्रामस्थ वाढीव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here