मुंबई – योगेश चांदेकर:
“पालघर हत्याकांड दुर्दैवी आहे. अफवांमुळे घडलेले हे हत्याकांड निषेधार्ह आहे. हि घटना घडायला नको होती. तसेच या घटनेचं राजकारण करू नये” असं मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधताना व्यक्त केलं. गृहमंत्रालय आणि प्रशासन दोषींना कडक शासन करण्यासाठी काम करेल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला.
“पालघर प्रकरणात तातडीने पावलं उचलली आहेत. कोणत्याही परिस्थितीत दोषींना पाठीशी घातले जाणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही तासांमध्येच या घटनेबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.” असेही पवार पुढे बोलताना म्हणाले.
याबरोबरच माध्यमांच्या बातम्या भीती निर्माण करणाऱ्या नको, तर बातम्या दिलासा देणाऱ्या असाव्यात, कोरोनाच्या परिस्थितीतून आपण बाहेर पडू. मात्र, माध्यमांनी समाजात भीतीचं वातावरण निर्माण करु नये. अशी विनंती पवार यांनी माध्यमांना केली आहे.