पालघर – योगेश चांदेकर:
तारापूर एमआयडीसी येथे एका राजकीय नेत्याच्या केमिकल कंपनीला २०१७ मध्ये कंपनीला संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच ‘कन्सेंट टू ऑपरेट’चे प्रमाणपत्र दिले आहे. मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी तक्रार करत सदर गोष्टीची शहानिशा करण्याची विनंती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होळकर यांच्याकडे केली होती. मात्र अद्यापही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही.
दरम्यान केमिकल कंपनीमध्ये उत्पादनासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक चिमणी, बॉयलर, रिऍक्टर, चिलिंग हब, कॉलम या गोष्टी अस्तित्वात नसल्याची माहिती मुंबई ई न्यूजकडे आल्याचे चांदेकर यांनी होळकर यांना सांगितले. कंपनीमध्ये प्रत्यक्ष पाहणी कधी केली आहे असे विचारले असता त्यांनी २०१९ मध्ये आलो असता गेट बंद होते असे सांगितले. तसेच दुसऱ्या दिवशी अथवा इतर कधी पाहणी का केली नाही असे विचारताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
मागील इतिहास पाहता सदर कंपनी प्रशासनाकडून कधी वाढीव उत्पादन क्षमतेसाठी कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट साठी तर कधी कन्सेंट तू ऑपरेटच्या नूतनीकरणासाठी परवानगी घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे २०१९ पासून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी केली नसेल तर अशा कंपन्यांची सुरक्षितता हि राम भरोसे आहे असेच म्हणावे लागेल. एवढंच नाही तर अशा कंपनीमध्ये जर उत्पादन होत नसेल तर त्यांनी परवानगी कोणत्या उद्देशाने घेतली आहे? तसेच उत्पादन होत नसेल तर याठिकाणी नेमके काय काम चालते? कोणत्या प्रकारच्या मालाची ने-आण होत असते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सदर कंपनीचे खरेदी विक्री व्यवहार तपासल्यास या गोष्टींची उकल होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. असे असले तरी तारापूर एमआयडीसीतील ‘त्या’ कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाची मेहेरबानी कशासाठी?