पालघर: मुंबई ई न्यूजच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या ‘त्या’ सूत्रधारांवर गुन्हा दाखल..!

0
467

पालघर – योगेश चांदेकर:

संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या चौघांवर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची लुबाडणूक झाली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुंबई ई न्यूजने याबाबत सातत्याने पाठपुरावा करत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद देण्याचे काम केले. यामध्ये आरोपी मधुकर सखाराम काकरा(रा. कोल्हाण), नारायण कान्हा डबके(रा. कोंडगाव), रुपेश पांडुरंग पाटील, दोषीराम कमळाकर घाटाळ, जानू रामा मोर यांच्यावर कलम ४२०,३८४,३८५,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईमधील ३५ टक्के रक्कम लुबाडल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. याबाबत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपींनी वारंवार शिवीगाळ करत पैसे वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पैसे घेतलेले पैसे हे सहमतीने नाही तर जबरदस्तीने वसूल केल्याचे देखील फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी जुलूम जबरदस्तीने पैसे वसूल केले आहेत तसेच आरोपी मारहाण करण्याची धमकी देखील देत होते त्यामुळे जिल्ह्यातील अनेक अन्यायग्रस्त बाधित शेतकरी हे दहशतीच्या खाली निमूटपणे लुबाडणूक होऊन देखील गप्प होते. आज याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ‘त्या’ दलालांवर कारवाई होणार याची खात्री झाल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने यामध्ये सामील असलेल्या इतर लोकांचे धाबे दणाणले आहेत. सखोल चौकशी झाल्यास यातील सहभागी सर्वांची पाळेमुळे बाहेर येतील व गरीब शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई होईल.

दरम्यान समाजमित्र मानवविकास संघटन, महाराष्ट्र् राज्य कार्याध्यक्ष विजय वझे व चांदेकर यांना हे सत्य उजेडात आणल्याची किंमत म्हणून मानहानी केल्याचे गुन्हे अंगावर घ्यावे लागले आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः या फसवणुकीबाबत प्रतिज्ञापत्र(ऍफिडेव्हिट) केले होते. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक पालघर यांच्याकडे याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपींवर कारवाईची विनंती केली आहे. तसेच स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची भूमिका घेतलेली असल्याने व शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. याप्रश्नी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शासन होण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून बोलताना दिला आहे. मुंबई ई न्यूज या प्रकरणी पाठपुरावा सुरूच ठेवणार असून बाधित शेतकऱ्यांनी निमूटपणे अन्याय सहन न करता 72766 44464 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील आम्ही करत आहे. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना कठोर शासन व्हावं यासाठी मुंबई ई न्यूज यापुढेही आग्रही असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here