MUMBAI e NEWS:

महाराष्ट्र शासनाच्या अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना 26 जानेवारीपासून एकविरा महिला बचतगट पंचायत समिती कार्यालय पालघर येथे सुरु होत आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता वरील ठिकाणी होणार आहे. गरीब, गरजू जनतेला सवलतीमध्ये भोजन मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले .

राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टोरेंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली आहे.

राज्य शासन या योजनेसाठी प्रत्येक जेवणाच्या ताटा मागे अर्थात प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये रुपये 50 तर ग्रामीण भागामध्ये रुपये 35 असे दर कंत्राटदारांना देणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांकडून केवळ 10 रुपये रक्कम घेतली जात असली तरी सदर थाळीची किंमत ही शहरी भागांमध्ये 50 रुपये व ग्रामीण भागामध्ये 35 रुपये असणार आहे. दहा रुपये वगळता अन्य रक्कम ही अनुदान असणार आहे. त्यामुळे या थाळीचा वापर गरजू गरीब नागरिकांसाठी व्हावा अशी अपेक्षा आहे. पालघर मध्ये शिवभोजन थाळीचे प्रशासनाने नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले

सद्यस्थितीत प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी व नगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. पालघर मध्ये ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच या भोजनालयातून शिव भोजन थाळी मिळणार आहे. शिव भोजन थाळी अंतर्गत प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल. प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. पालघर मध्ये 26 जानेवारी पासून शिवभोजन योजना सुरू होणाऱ आहे या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here