पालघर – योगेश चांदेकर
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्य सेवा देणाऱ्या वाहनांना मुभा देण्यात आली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत दुधाच्या टँकरमधुन चक्क कामगारांना गावी घेवुन जात असल्याचा प्रकार तलासरीत उघड झाला आहे. कल्याणहून राजस्थानकडे जाणाऱ्या दुधाच्या टँकरमध्ये कामगारांना घेवुन जात असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता टँकर मध्ये एक ना दोन तब्बल १२ जण असल्याचे समोर आले.
संचारबंदीमुळे आपल्या गावाकडे जाण्यासाठी काही कामगार पायी जात असल्याचे राज्यात ठिकठिकाणी अमोर आले होते. काही कामगार अनेक युक्त्या लढवत आहेत. कल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी 12 कामगारांनी चक्क दुधाच्या टँकर मधुनच प्रवास करताना पालघर जिल्ह्यात पोलिसांनी कामगार व टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. तलासरी पोलिसांनी शनिवारी सकाळी 11 च्या दरम्यान सदर टँकर तपासणीसाठी थांबवले होते. तपासणी केली असता त्यामुळे कोंबुन भरलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. तलासरी पोलिसांनी टँकर सह चालक आणि प्रवाशांना ताब्यात घेतले आहे.