सीमा भागातील गावांमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण

0
404

पालघर – योगेश चांदेकर:
गुजरात राज्यातील पोरबंदर, ओखा, वेरावळ इत्यादी भागांमध्ये खलाशी म्हणून काम करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना गुजरातच्या नारगोळ बंदरात उतरू न दिल्याने जिल्ह्यातील खलाशी समुदायांमध्ये तसेच राज्याच्या सीमा भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुजरात राज्यातील नागरिकांना आपल्या भागातील बाजारपेठेमध्ये येऊ न देण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिवांना अडकलेल्या खलाशांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

गुजरातच्या वेरावळ भागात कार्यरत असणाऱ्या सुमारे दोन हजार खलाशांना 4 एप्रिल रोजी आपल्या घरी परतण्यासाठी गुजरात भागात आले होते. या खलाशांना प्रथम गुजरात मधील स्थानिकांनी उतरण्यास मज्जाव केला. 5 एप्रिल रोजी गुजरातचे रहिवासी असलेल्या 1125 खलाशाना किनाऱ्यावर उतरवून घेतल्यानंतर महाराष्ट्रामधील खलाशांना त्याठिकाणी उतरविण्यास गुजरात प्रशासकीय विभागाने नकार दिला. रात्रीच्या वेळी बंदरांमध्ये नांगरलेल्या बोटींचे दोर कापल्याने तसेच गोळीबार करण्याची धमकी दिल्यानंतर पालघर जिल्ह्यातील 2000 खलाशी असणाऱ्या बोटीना नाईलाजास्तव वेरावळ येथे परतावे लागले.

या खलाशांनी आपल्या नातेवाईकांना पाठवलेल्या व्हिडिओमध्ये वेरावळ मध्ये आपली व्यवस्थित सोय होत नसल्याची तक्रार नोंदवली आहे. वेरावळ येथे देखील गुजरात राज्यातील खलाशांना उतरण्यास परवानगी असून इतर राज्यातील किमान २०-२५ हजार खलाशी मासेमारी बोटींमध्येच राहत असल्याचे अडलेल्या खलाशांचे नातेवाईक सांगत आहेत. संचारबंदी उठल्यानंतर किंवा ती लांबल्यास आम्ही रीतसर परवानगी घेऊन येऊ असे खलाशांनी कळविले आहे. तलासरी येथील मधुकर राजद यांची चार मुले खलाशी म्हणून वेरावळ येथे असून त्या सर्वांचे खाण्याचे हाल होत असल्याचे त्यांनी मोबाईल वरून कळाल्याचे सांगितले. मासेमारी बोटींवर राज्यातील किमान तीन ते चार हजार खलाशी अडकून पडले असून त्यांना पिण्यासाठी पाणी देखील व्यवस्थित मिळत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे सांगितले. या खलाशांना मोबाईलचा देखील चोरून वापर करावा लागत असल्याचे सांगितले जात असून अशा अमानुष वागणुकीमुळे तलासरी व डहाणू भागातील अडलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

नारगोळ बंदरापासून आपली गाव अवघे दोन- तीन किलोमीटरवर असताना आपल्याला तेथे उतरून न दिल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे गुजरात सरकारने राज्यातील खलाशांना दुजाभवाने वागवले तसेच तलासरी, डहाणू तालुक्यातील आणि पालघर जिल्हा प्रशासनाने याबाबत आवश्यक पाठपुरावा केला नसल्याची खंत तलासरी तालुक्यातील मंडळी करीत आहेत. आगामी काळात गुजरातमधील नागरिकांना आपल्या भागातील बाजारपेठे मध्ये येण्यास मज्जाव करू अशा स्वरूपाचा इशारा वेरावळ येथे अडकून पडलेल्या खलाशांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील सीमा भागात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दम्यान राज्यातील अडलेल्या खलाशांची काळजी घेण्यात यावी यादृष्टीने जिल्हाधिकारी यांनी राज्याच्या मदत व पुनवर्सन सचिवांना पत्र लिहिले असून मच्छीमार नेते नरेंद्र पाटील, राजन मेहेर, ज्योती मेहेर आदी मंडळी गुजरात राज्यातील मच्छीमार नेत्यांशी संपर्कात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here