मुंबई ई न्यूज नेटवर्क | देशात कोरोनाबाबतची भयावह परिस्थिती ओढवली आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या संदर्भात काहीच बोलत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह गायब आहेत, अशा प्रकारे त्यांची खिल्ली काँग्रेसकडून उडवली जात आहे. या मुद्द्यावरील प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान आणि गृहमंत्री देशातच आहेत पण त्यांचे अस्तित्व जाणवेल अशा उपाययोजना त्यांच्याकडून केल्या जायला हव्यात, अशा शब्दात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
“कोणी काहीही म्हणत असेल तरी मी सांगतो की पंतप्रधान गायब नाहीत. ते आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतात. गृहमंत्रीदेखील आहेत, ते देखील चर्चेत उपस्थित असतात. पण ते दोघे दिसून येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या देशात सरकार आहे, प्रशासन आहे, पंतप्रधान आहेत, आरोग्य मंत्रीही आहेत, केंद्र सरकारदेखील जागेवरच आहे पण त्यांचे अस्तित्व जाणवेल अशाप्रकारे कार्यप्रणाली वापरणं गरजेचं आहे. कोणाचेही अस्तित्व अदृश्य होऊन चालणार नाही”, असं स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केलं.