पालघर – योगेश चांदेकर :
तारापूर एमआयडीसीतील बेजबाबदार केमिकल कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण महामंडळातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून बेजबाबदार अधिकाऱ्यांसह संबंधित कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांच्यातून होऊ लागली आहे. कोणतीही पाहणी न करता ‘मेसर्स सन केमिकल्स’ या केमिकल कंपनीला ‘कन्सेंट टू ऑपरेट’ची परवानगी दिली असल्याचे समोर आले आहे. याबाबतचे पत्र मुंबई ई न्यूजच्या हाती लागले असून, केमिकल कंपन्यामधील परिस्थीतीची शहानिशा न करताच अधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच कशी? या कंपन्यांना वारंवार पाठीशी घालण्यामागे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे नक्की कोणते हितसंबंध दडले होते? अशा प्रश्नांची विचारणा नागरिकांमधून होऊ लागली आहे.

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये अनेकवेळा गुढ अपघाती स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर शेकडो कामगार कायमस्वरूपी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मुंबई ई न्यूजचे विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी अशा कंपन्यांचा मागोवा घेत, उत्पादनासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक चिमणी, बॉयलर, रिएक्टर, चिलिंग हब, कॉलम या गोष्टीच अस्तित्वात नसल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी होळकर यांना दिली होती. परंतु या अधिकाऱ्याने प्रकरण गांभिर्याने न घेता उडवाउडवीचीच उत्तरे दिल्याचे आत्तापर्यंतच्या घटनांमधून दिसून आले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीची पाहणी न करताच अपघातास कारणीभूत असणाऱ्या या कंपन्यांना ‘कन्सेंट टू ऑपरेट’चे प्रमाणपत्र देत असल्याचे उघड झाले आहे. हे प्रमाणपत्र देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये सुरू आहे.

दरम्यान कंपनी प्रशासनाकडून कधी वाढीव क्षमतेसाठी कन्सेंट टू इस्टॅब्लिशमेंट तर कधी कन्सेंट टू ऑपरेटच्या नूतनीकरणासाठीही परवानगी मागण्यात आली होती. नियमाप्रमाणे संबंधित अधिकाऱ्याने भेट देऊन पाहणी करणे गरजेचे असताना पाहणी न करताच हे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे या कंपन्यामधील सुरक्षिता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर जर या कंपन्यांमध्ये काही उत्पादनच होत नसेल तर नेमक्या कोणत्या कारणाने या कंपन्या इथे आपले अस्तित्व राखून आहेत, कंपन्याच्या अंतर्गत भागात नेमके काय चालते, कुठल्या प्रकारच्या मालाची ने-आण केली जाते हे देखील तपासणे गरजेचे आहे. संबंधित प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीच अशा कंपन्यांना पाठिशी घालत असून लोकांच्या जिवाशी खेळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here