पालघर – योगेश चांदेकर:
कोरोना व्हायरसमुळे देशात लॉक डाऊन करण्यात आल्यानंतर आपल्या देशातल्या गरीब जनतेवर खूप मोठा संकट आलं. हाताला काम मिळालं तरचं चूल पेटेल अशी परिस्थिती असणारा मोठा वर्ग आजही समाजात आहे. रात्री ८ वाजता लॉक डाऊन जाहीर झालं आणि हातावर पोट आहे त्यांची झोपच उडाली. अशा परिस्थितीत शासकीय मदत मिळेपर्यंत कसा गुजारा करायचा हा त्या सर्वांसमोरच प्रश्न आहे.
प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अशाच गरजू लोकांना मदत करण्यासाठी वेग वेगळ्या संस्था पुढे येत आहेत. अनेक दानशूर हात भुकेल्यांच्या उपाशीपोटी मायेचे दोन घास मिळावे यासाठी झटत आहेत. अगदी याप्रमाणे बोईसर शहरातील श्री महालक्ष्मी पदयात्री मित्र मंडळ बोईसर भंडारवाडा या संस्थेकडून दररोज 1000 ते 1100 गरजू लोकांना दुपारचे जेवण देण्यात येत आहे. इतकेच नाही तर बोईसरमध्ये ज्या ज्या ठिकाणी गरजू लोकांना मदत लागते त्या ठिकाणी ह्या मंडळाचे सदस्य स्वतःहून जेवण पुरवतात.
आकाश जयस्वाल, अभिजीत श्रीवास्तव, अजय गुप्ता, संकेत पाठक, अमेय ठाकूर, अभिषेक श्रीवास्तव, आलोक पाठक, चिन्मय ठाकूर, विकास चौहान यांच्यासह मंडळाचे सर्वच कार्यकर्ते स्वतःला झोकून देऊन हे काम करत आहेत. डॉ. जयेश कुवर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. मंडळाच्या या कामाचे बोईसर भागात विशेष कौतुक होत आहे.