मुंबई – अरुण पाटील:
डहाणू तालुक्यातील वेती कातकरी पाडा गट नं १ हा आदीम जमातीच्या लोकवस्तीचा पाडा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा पाडा विजेपासून वंचीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर पाड्यामध्ये गेल्या २० ते २५ वर्षांपासून विजेच्या खांबांच्या अभावामुळे कातकरी पाडा नं १ व नं २ मध्ये आजपर्यंत विजेची सोय ग्रामपंचायतने केलेली नाही. सदर पाड्यामध्ये ४५ ते ५० कुटुंबाची लोकवस्ती असून विजेअभावी त्यांची गैरसोय होत असल्याने या परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न पाड्यातील जनतेला पडला होता. मुंबई ई न्यूज डहाणू प्रतिनिधि जितेंद्र पाटील यांनी या गोष्टीची माहिती मुंबई ई न्यूजचे विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना दिली. योगेश चांदेकर यांनी याबाबत पाठपुरावा करत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले होते.
रात्रीच्या वेळी पाडयात संपूर्ण अंधार असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच पावसाळा जवळ येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल होतो व सर्प फिरत असल्याने पावसाळ्यात लोकांमध्ये मोठे भीतीचे वातवरण आहे, त्यामुळे खुप मोठी समस्या निर्माण होऊ शकते या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत पालघर मंडळ अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्या हि गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यांनी यागोष्टीची माहिती घेत तात्काळ काम सुरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. एकाच दिवसात या कामाबद्दल सर्वे करत १८ विजेच्या खांबांच्या कामाची कार्यवाही सुरू देखील झाली.
विजेच्या अभावामुळे चिंतेत असणाऱ्या पाड्यातील लोकांना हि गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मुंबई ई न्यूजचे विभागीय संपादक योगेश चांदेकर व पालघर मंडळ अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांचे आभार मानले. २५ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न एकाच दिवसात मार्गी लागल्याने पाड्यातील लोकांना जणू स्फुरणंच चढले. अनेकांनी मोबाईलद्वारे मुंबई ई न्यूजला थेट संपर्क साधत योगेश चांदेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले.