पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एका पाड्यातील जिल्हा परिषद शाळा इमारत ही शैक्षणिक वास्तू आहे की किराणा मालाचे गोडाऊन आहे असा प्रश्न गावातील सुज्ञ लोकांना पडला आहे. गावातील एका किराणा दुकानदाराने चक्क 1200 ते 1300 किलो गुळ जिल्हा परिषद शाळेतच उतरवून घेतला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अधिकची माहिती अशी कि या प्रकारात ग्रामपंचायतची परवानगी घेणे सोडा या घटनेची कानोकान खबर सुद्धा कोणास लागू दिली नाही. शिक्षकाकडे असणारी चावी घेउन ग्रामपंचायत व गावातील इतर लोकांना न कळू देता गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार सुरू होता. याबाबत विचारले असता दुकानदाराने तो गुळ गरोदर महिलांना वाटण्यासाठी आणला होता असे उत्तर दिले खरे मात्र जर गावातील महिलांना गूळ दिलाच गेला नाही तर हा गुळ नेमका कुठे विरघळला हे एक कोडेच आहे. शाळेच्या इमारतीचा असा वापर करणे कितपत योग्य आहे? यामुळे इमारतीचे काही गैरप्रकार होऊन अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदारी घेणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन असा गैरवापर होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.