मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी मुंबई महापालिकेने बाहेरगावाहून मुंबईत परतणाऱ्यांसाठी १४ दिवस घरात विलगीकरण सक्तीचे केले आहे. त्यामुळे गणपतीसाठी गेलेल्या चाकरमान्यांची गावी आणि मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी विलगीकरण केल्याशिवाय सुटका नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
एकीकडे राज्य सरकार कोकणात जाणाऱ्यांना दहा दिवसाचा क्वारंटाईन नियम लागू केला आहे आणि दुसरीकडे त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतण्यासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन नियम लावत आहे. ह्या सरकारचं डोकं सरकलय की काय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2020
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांना राज्य सरकारनं नुकतीच क्वारंटाइन कालावधीत सवलत दिली आहे. त्यांचा १४ दिवसांचा कालावधी १० दिवसांवर आणला आहे. मात्र, त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतल्यानंतर १४ दिवस घरात राहावं लागणार आहे. निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारला टोला हाणला आहे. ‘ह्या सरकारचं डोकं सरकलंय की काय,’ असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.