मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीत मंत्रीमंडळाने 4 महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
1. ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या कायम प्रवास भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा भत्ता आता 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2.ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात येणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आलंं आहे. दिवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर पुल बांधणे आवश्यक असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं आहे. पूल बांधकामासाठी मंजूर विकास योजनेमध्ये फेरबदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता देखील देण्यात आली आहे.
3. भोगवटादार वर्ग-2 कडे असलेल्या नवीन इनाम व वतन जमिनी आहेत. त्यांच्यावरील अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यानुसार नियमित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. यात महार वतन व देवस्थान जमीन वगळण्याचा निर्णय झाला आहे.
4. आयुष मंत्रालयांतर्गत येणारी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीनल प्लांटस’ ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील अडाळी येथे स्थापन करण्याच्या केंद्र शासनाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी त्यांना 50 एकर जागा देण्यात येणार आहे.