पालघर – योगेश चांदेकर:
कोरोनामुळे मासेमारी व्यवसाय उध्वस्त झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून देखील मासेमारी व्यवसाय झालेला नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांप्रमाणेच राज्यसरकारने मच्छिमारांना मदत करण्याची विनंती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सध्या कोरोनामुळे मच्छिमारांवर उपासमाळीची पाळी आली आहे म्हणून मच्छिमारांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
ONGC कंपनी समुद्र मध्ये साईस्मिक सर्व्हे करताना मासेमारी व्यवसाय बंद ठेवला जात असे त्यासाठी ONGC कंपनीने आपल्या नफ्यातील दोन टक्के निधी मच्छिमारांना भरपाई म्हणून जमा केली जात आहे. गेल्या २० वर्षात १० हजार कोटींचा निधी मच्छिमारांसाठी कंपनीकडे जमा आहे. गेल्या वर्षी तत्कालीन मत्स्यव्यवसाय राज्य मंत्री अर्जुन खोतकर साहेब ह्यांच्याकडे झालेल्या बैठकीत मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याचे कंपनीचे मुख्य व्यवस्थापक ह्यांनी मान्य केले होते. याबाबत तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे दिवंगत खासदार चिंतामण वाणगा यांनी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळा समवेत मागणी केली होती. यावर कंपनीकडून आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळॆ मच्छिमारांवर उपासमाळीची पाळी आली आहे.
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही २००५ पासून ONGC कंपनीकडून मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी आजवर केलेला पाठपुरावा सादर करत मदत मिळावी अशी विनंती केली आहे. मच्छिमारांना आर्थिक मदत मिळणे फार गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून बांधकाम कामगारांना ज्या पध्दतीने मदत मिळवून दिलेली आहे त्याच प्रमाणे मच्छिमारांना मदत मिळवून द्यावी” – दामोदर तांडेल (अध्यक्ष – अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती)