MUMBAI e NEWS :
स्वातंत्र्य मिळवून बराच काळ झाला असूनही अद्याप ब्रिटीशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. समाजाच्या गरजेनुसार आणि बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत सिंहावलोकन करून त्यात बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिक येथील न्या. कै. एच. आर. खन्ना सभागृहात महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे आयोजित वकील परिषद 2020 अंतर्गत ‘जलद व आधुनिक न्यायदानाच्या दिशेने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, परिवहन मंत्री अनिल परब, नाशिकच्या पालक न्यायमुर्ती अनुजा प्रभुदेसाई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मकरंद कर्णिक, न्यायाधीश संदिप शिंदे, भारताचे अतिरिक्त महाधिवक्ता ए. एन. एस. नाडकर्णी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील शेखर नाफडे आदी उपस्थित होते.