मुंबई ई न्यूज नेटवर्क :
मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची गंभीर दखल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सदर प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.
पालघर तालुक्यातील कुडण येथील दिव्यांग वडापाव विक्रेत्याचे मारहाण प्रकरण, युरियाचा भ्रष्टाचाराचा पाठपुरावा, शिवसेना जिल्हाप्रमुख निवडीचा घेतलेला पोल अशा अनेक गोष्टींचा राग मनात धरून शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे कृषि व पशु संवर्धन सभापती सुशिल चुरी यांनी निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या योगेश चांदेकर यांच्यावर कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी चांदेकर यांनी अनेकवेळा आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. त्यामुळे सुशील चुरी याने आपला भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीमुळे हा हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया काळ्याबाजारात जाऊ नये यासाठी जीव जोखमीत घालणाऱ्या पत्रकाराला जीवे मारण्याच्या घटनेचा निषेध करीत याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून न्याय मिळावा अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली होती. सदर घटनेतील लोकक्षोभाचा विचार करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही गुन्हेगारांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.